Saturday 4 July 2015

माणदेशाची जीवन वाहिनी माई माणगंगा -

माणदेशाची जीवन वाहिनी माई माणगंगा -
जमिनीतील 'वैशिष्ट्यपूर्ण थराला माण' नाव मिळाले. ज्या भागात 'माण' जमिनीत सापडते तो माणदेश व माणदेशातून वाहणारी नदी ती
माण नदी. माण नावाचे गाव माणदेशात कधिही नव्हते व नाही. पश्चिम-उत्तर दिशांनी सर्व बाजूंनी शंभू महादेवाचे उंचच उंच डोंगर, उत्तर दिशाकडे उंच
डोंगररांगेत शिखर शिंगणापूरचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर, त्या पलीकडे निरा नदी चे
खोरे, सुमारे चार हजार फुट खोल दर्र्या सलग पन्नास ते साठ मैल लांब प्रदेश उघड्या डोळ्यांनी बघीतल्यासारखा दिसतो. पुढे त्याच डोंगररांगेतून पूर्वेस जस जसे जावे तसे भिमा खोरे दिसते. आता पश्चिम दक्षिण दिशांकडे देखील उंचच उंच डोंगर असून त्या पलीकडे येरळा नदीचे खोरे दिसते. दक्षिण बाजूस भिवघाट व तसेच पूर्वेस डोंगरराजीतून खाली उतरले असता जत तालुक्याच्या सीमा,
पलीकडे दोड्डा नाला खोरे दिसते. आता पश्चिम ते पूर्व भूभाग माण नदी ज्या कुळकजाई ता.माण सिताबाई डोंगरातून उगम पावून पूर्वेस सरकोलीजवळ भीमा नदीस मिळते. हा प्रवास 180 कि.मी. व दक्षिणोत्तर भूभाग 91.2 कि.मी. असून हा संपूर्ण माणदेश आहे. माणदेशात यावयाचे तर खिंडीशिवाय रस्सा नाही.
राष्ट्रकुट राजघराण्यातील प्राचीन राजा 'मानाड्क' याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती 'मानपूर नगरी' सध्या राजेवाडीच्या तलावात स्थिरावली आहे. ब्रिटिश सरकारने इ.सन 1873 साली राजेवाडी तलाव निर्माण करून मानपूर नगरीचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करून टाकले. तथापि त्या ठिकाणच्या जवळच अद्याप शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे नाव आहे . प्रत्यक्ष पाहून मग 'मानपूर नगरी' ची कल्पना
येईल. या मानाड्क राजाचा देश 'माणदेश' म्हणून पुढे प्रसिद्ध पावला, असे काही
इतिहासकारांच मत आहे.'मानाड्क' राजाने इ.स.375 च्या दरम्यान राज्य
केले. मानपूरचे राष्ट्रकुट राज्य इ.स.974 च्या सुमारास मोडले. तेव्हापासून मानपूरचे अस्तित्व संपले. मानाड्क राजाचा पुत्र देवराज राज्य करत
होता. याच देवराज राजाच्या नावावरून देवापूर नाव पडले. देवापूर गाव सध्या आहे.देवराज राजाचा पणतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. माणदेशावर चालुक्य, शिलाहार, देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.
म्हसवड इतिहास प्रसिद्ध प्राचीन गाव आहे. त्याठीकाणी माणगंगा नदीकाठी , उत्तरेस बाजीराव धुहाळांनी इ.स दहाव्या शतकात श्री.सिद्धनाथ जोगेश्वरी मंदीर बांधले. श्री सिध्दनाथ जोगेश्वरी शंकर पार्वतीची रूपे आहेत. मानाड्क राजाचा नातू गरूड राजा राज्य करीत असताना म्हसवडच्या सिध्दनाथ मंदिरात परंपरागत पांढरा हत्ती होता. तो वारला. गरूड राजाने परांड्याच्या किल्ल्यातून
प्रचंड मोठा दगड आणून मेलेल्या हत्तीची प्रतिकृती घडवली. तोच हा सुंदर देखणा हत्ती. माणदेशातील इतिहास कालीन घटना- भिल्लणाचा नातू सिंघण (1120 ते 1247) हा शिवभक्त राजा होता. त्याने शिखर शिंगणापुर हे गाव शंभू महादेवाच्या मंदिराजवळ वसविले.1187 साली कलचुरी राजाचा पराभव करून माणदेशावर भिल्लणदेव यादवाने यादवांची राजवट चालू केली. इ.स.1209 साली म्हसवड चे सरदार माने यांनी पन्हाळा किल्ला घेतला व कसबा बीडवर
आक्रमण केले. इ.स.1659 साली छ.शिवाजीराजे व सरदार रथाजी माने यांची गुप्त बैठक शिखर शिंगणापुरचे पूर्वेस दोन कि.मी.अंतरावर गुप्त लिंगाच्या देवळात झाली. इ.स.1667 रथाजी माने यांचा विजापूरच्या अदिलशहाच्या सरदाराकडून फसवून वध केला.इ.स.1693 मार्च नागोजी माने विदर्भाकडे स्वारीस गेले. इ.स.8 एप्रिल 1697 सेनापती संताजी घोरपडेचा म्हसवड येथे मुक्काम होता.
इ.स.16 जून 1697 सेनापती संताजी घोरपडे व पुतळाबाई कारखेलच्या(ता-माण) रानात मृत्यूमुखी पडले.माणदेशात ब्रिटिशाविरूध्द बाज्या बैज्याचे
माणदेशी बंड. तुकाराम पुकळे यांचा सातारा, माढा व धुळे येथे नाना पाटिल यांच्या प्रतिसरकारात सहभाग. माणदेशात 16 व्या व 17 व्या शतकात
औरंगजेबाच्या माणदेशात लष्करी छावण्या. औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्ष होता.13 वर्ष म्हसवड पासून 12 ते 45 मैल एवढ्या अंतरावर
खवसपूर, ब्रम्हपूरी, अकलूग येथे होत्या. 1-10-1700 माण नदीला अचानक महापूर आला. छावणीची वाताहत झाली. औरंगजेब पाण्यातून निघताना खडकावर आपटला. गुडघा मोडले व पुढचे दात पडले. (माण गंगेने औरंगजेबाला शिक्षा दिली).
माणगंगा नदीला एकूण 63 ओढे, नाले, उपनद्यांचा संगम होऊन भिमा नदीस मिळते. माणदेशाचा प्रदेश 74` 22 मी.30` सें ते 75`,30 मी.पूर्व रेखांशावर आहे. त्याचा अक्षांश 17` उत्तर अक्षांश ते 17`,51 मी, 41` सें.उत्तर अक्षांश आहे. माणदेशाचा पूर्व-पश्चिम विस्तार 116.8 किलोमीटर व दक्षिणोत्तर विस्तार 91.2
किलोमीटर असा आहे. माणदेशाचे क्षेत्रफळ 48,700 चौ. किलोमीटर आहे. सध्या माणदेशात सातारा, सांगली व सोलापूर अशा तीन जिल्ह्यांच्या सिमा हद्दीवर आहे.

No comments:

Post a Comment